khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

MLA : महाराष्ट्रातील आमदारांवर ‘घात’ योगाचे गंडांतर !

विश्लेषण / श्रीपाद सबनीस

महाराष्ट्र विधिमंडळातील आमदार जणू काही (अप) घात योगाचे बळी ठरत आहेत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ‘शिवसंग्राम’चे संस्थापक-अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अपघातापासून सुरु झालेली मालिका आता बच्चू कडू यांच्यापर्यंत येऊन पोहोचली आहे. राज्य विधीमंडळात जेष्ठ आणि अनुभवी नेत्यांची गरज असतांना त्यांच्या वाट्याला असे अपघात योग येणे हे दुर्दैवी आहे.

महाराष्ट्रातील रस्ते आता पूर्वीपेक्षा अधिक प्रवाही झाले आहेत. समृद्धी महामार्गामुळे वाहनांच्या गतीचे भान हरवत चालले आहे. परिणामी अपघातांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. म्हणूनच आता असे सुचवावेसे वाटते कि, नेत्यांनो गाडी भलेही सुसाट पळवा, घरी कोणी वाट पाहातंय हे पण लक्षात ठेवा.

गेल्या महिनाभरात महाराष्ट्रातील चार आमदारांचे अपघात झाले आहेत. ही आकडेवारी कमी असली तरी धक्कादायक आहे. कारण यापूर्वी एवढ्या झटपट आमदारांचे अपघात कधीही झाले नव्हते. विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर महिनाभरातच उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू झाला. यावेळी राज्यातील रस्ते, पोलीस-वैद्यकीय यंत्रणांवर उहापोह झाला होता. मात्र परिस्थिती ‘जैसे थे’ आहे.

यानंतर काही महिने होत नाही तोच एकामागोमाग एक अशा चार आमदारांच्या वाहनांचा अपघात झाला आहे. यामध्ये योगेश कदम, जयकुमार गोरे, धनंजय मुंडे आणि आता बच्चू कडूंचा अपघात झाला आहे. यामुळे रस्ता आणि वाहतूक सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

माण तालुक्याचे भाजपाचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीचा फलटण शहरानजीक भीषण अपघात झाला. फॉर्च्युनर कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी ५० फूट नदीत कोसळली. या घटनेत आमदार जयकुमार गोरे यांच्यासह इतर ४ जण जखमी झाले. गोरे यांच्या बरगड्यांना मार बसला, तर पायालाही गंभीर दुखापत झाली होती. २४ डिसेंबर २०२२ रोजी ही घटना घडली.

यानंतर राष्ट्रवादीचे फायरब्रँड नेते धनंजय मुंडे यांच्या कारला अपघात झाला. यामध्ये कारच्या पुढील भागाचा चकणाचूर झाला होता. मुंडे यांच्या डोक्याला आणि छातीला मार लागला. ४ जानेवारीला परळीला जात असताना हा अपघात झाला होता. मुंडे यांना पुढील उपचारासाठी मुंबईला हलविण्यात आले होते.

यानंतर दोनच दिवसांनी शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या कारला अपघात झाला . ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांच्या कारला कशेडी घाटामध्ये ६ जानेवारीला अपघात झाला. खेड येथून मुंबईकडे येत असताना त्यांच्या कारला टँकरने धडक दिली होती. योगेश कदम यांना किरकोळ दुखापत झाली होती.

आता बच्चू कडू यांच्या अपघाताने पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा, वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत आहे. कडू यांना एका कार्यक्रमाला जाण्यासाठी रस्ता ओलांडत असताना दुचाकीस्वाराने उडविले. दुभाजकावर कडू यांचे डोके आदळले, तसेच दुचाकी आदळल्याने पायाला दुखापत झाली. कडू यांच्या डोक्यावर चार टाके पडले आहेत.

वाहतूक शिस्तीचा बोजवारा
गोपीनाथ मुंडे, विनायक मेटे, सायरस मिस्त्री यांच्या अपघातावेळी राजकीय व्यक्ती रस्ते अपघाताबाबत रस्ते सुरक्षा, हॉस्पिटले, वैद्यकीय मदत आदीवर बोलत होते, परंतू या दोघांच्या मृत्यूनंतरही आजही स्थिती ‘जैसे थे’च आहे. वाहतूक शिस्तीचा पुरता बोजवारा उडाला आहे. याचाच अर्थ सरकार कोणत्याही पक्षाचे असो; एकूणच परिस्थिती, संबंधित सरकारी यंत्रणेची उदासीनता यात काही बदल होत नाही किंबहुना वाहतूक शिस्त स्वीकारण्याची इच्छाशक्ती ना जनतेत आहे, ना राजकीय नेत्यात, संबंधित सरकारी यंत्रणेत आहे.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like