नवी दिल्ली : प्रतिनिधी
भारतात वापरल्या जाणा-या प्रत्येक तीन घरगुती एलपीजी सिलेंडरपैकी दोन पश्चिम आशियातून येतात. आता इराणने होर्मुझचा समुद्रमार्ग बंद करण्याची धमकी दिली आहे, जो कच्चे तेल आणि एलपीजी पुरवठ्याचा प्रमुख मार्ग आहे. भारताकडे सध्या फक्त १६ दिवसांचा एलपीजी साठा आहे. अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यानंतर जर पश्चिम आशियातील तणाव आणखी वाढला आणि पुरवठा साखळी प्रभावित झाली, तर याचा सर्वात पहिला परिणाम सामान्य लोकांच्या स्वयंपाकघरावर होईल.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारत इच्छा असूनही मोठ्या प्रमाणात एलपीजी साठवणूक करू शकत नाही. याचे कारण साठवणुकीच्या मर्यादित सुविधा आहेत. भारत केवळ १६ दिवसांसाठी आवश्यक असलेला एलपीजी साठा करू शकतो. एका वरिष्ठ अधिका-याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, जर आता ऑर्डर दिली तरी डिलिव्हरी पुढील महिन्यात किंवा त्यानंतरच येईल. साठवणुकीचीही मर्यादा आहे. सध्या तरी जास्त धोका नाही, फक्त सतर्क राहण्याची गरज आहे.
गेल्या दशकात भारतातील एलपीजीचा वापर दुप्पट झाला आहे. सरकारी योजनांमुळे आता ३३ कोटी घरांपर्यंत एलपीजी सिलेंडर पोहोचले आहेत. यामुळे भारताची आयातीवरील अवलंबिता देखील खूप वाढली आहे. आपल्या ६६% एलपीजी गरजा आयातीतून पूर्ण करतो आणि त्यापैकी सुमारे ९५% हिस्सा सौदी अरब, यूएई आणि कतार यांसारख्या पश्चिम आशियाई देशांतून येतो.