नौशहरो : News Network
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधु नदीचे पाणी अडवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे पडसाद आता पाकिस्तानमध्ये दिसत आहेत. भारताने पाणी रोखल्याने सिंधमध्ये गृहयुद्ध सदृश्य परिस्थिती आहे. जनतेचा असंतोष इतका भडकला आहे की, आंदोलकांनी सिंधच्या गृहमंत्यांचे घर पेटवून दिले आहे. आंदोलक सरकारच्या नियंत्रणाबाहेर गेल्याचे दिसत असून या आंदोलनात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत.


एकीकडे सिंधु नदीचे पाणी भारताने अडवले आहे. तर दुसरीकडे सरकारच्या सहा कालवे प्रकल्पाला सिंध प्रांतातील लोकांचा प्रचंड विरोध सुरू आहे. या आंदोलनाला हिंसक वळण लागले. पाकिस्तानातील सिंध प्रांताचे गृहमंत्री जियाउल हसन लंजर यांचे नौशहरो जिल्ह्यातील घर आंदोलकांनी जाळले. त्यांच्या घराची मोठी नासधूस करण्यात आली. आंदोलकांच्या हाती यावेळी बंदुका होत्या. या बंदुकातून अनेकांनी हवेत गोळीबार केला. गृहमंत्र्याच्या घरातील काही लोकांना मारहाण करण्यात आली. आंदोलकांनी यावेळी शेकडो वाहने पेटवून दिली.

दरम्यान, पोलीस आणि आंदोलकात अगोदर बाचाबाची झाली. पुढे पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. आंदोलकांनी पोलिसांसह गृहमंत्र्याच्या घरावर हल्ला चढवला. या आंदोलनात, दोन आंदोलकाचा मृत्यू झाल्यानंतर जमाव हिंसक झाला. संतप्त जमावाने पोलिसांची वाहने जाळली. त्यात एक डीएसपी आणि इतर अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.