लंडन : News Network
ग्लोबल वॉर्मिंगने घायाळ केलेले असतानाच आता ब्रिटनने धक्कादायक पाऊल उचलले आहे. ब्रिटीश सरकार येत्या काही आठवड्यात सूर्याचे तेज (तापमान) कमी करण्यासाठी शास्त्रज्ञांना सूर्याचा प्रकाश कमी करण्याच्या प्रयोगाची परवानगी देणार आहे. म्हणजेच ब्रिटिश शास्त्रज्ञ थेट सूर्याशीच पंगा घेणार आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आणि शास्त्रज्ञांना खरोखरच असं करता येईल का? याचे कुतुहलही वाढले आहे.

या कामासाठी सुमारे ५० मिलियन पाऊंड (म्हणजे सुमारे ५०० कोटी रुपये म्हणजेच ५ अब्ज) चे बजेटही तयार करण्यात आले आहे. पण या प्रयोगावर टीकाही होत आहे. यासंदर्भात शास्त्रज्ञ एक खास टेक्निक तयार करत आहेत. त्याद्वारे हवेत विशिष्ट प्रकारचे एअरोसोल्स म्हणजे कण सोडणार आहेत. हे कण वातावरणातील सर्वात ऊंच लेअरवर ज्याला स्ट्रॅटोस्फियर म्हणतात, तिथे पाठवले जातील. असे केल्याने सूर्याची काही किरणे पृथ्वीवर येणार नाहीत. त्यामुळे पृथ्वीचे तापमान थोडे कमी होईल. या शिवाय आणखी एक पद्धत आहे. ढगांना चमकदार बनवणे. ढग अधिक चमकदार केल्यास ते अधिक प्रकाश अंतराळात पाठवतील. त्यामुळे पृथ्वीवर गर्मी कमी जाणवेल.

शास्त्रज्ञांच्या मते या प्रयोगामुळे वातावरणाच्या नैसर्गिक चक्रामध्ये परिवर्तन होऊ शकते. त्यामुळे पावसाचा पॅटर्नही बदलू शकतो. वादळाची तीव्रता वाढू शकते. काही ठिकाणी दुष्काळ येऊ शकतो. त्यामुळेच शास्त्रज्ञ वारंवार हा प्रयोग करू नका म्हणून सांगत आहेत. या प्रकल्पाला ब्रिटनच्या ऍडव्हान्स्ड रिसर्च ऍण्ड इन्व्हेन्शन एजन्सीकडून निधी दिला जात आहे. या एजन्सीने जिओ-इंजिनीअरिंग संशोधनासाठी खास ५० दशलक्ष पाउंडचा निधी राखून ठेवला आहे. प्रोग्राम डायरेक्टर मार्क साइम्स यांनी सांगितले आहे की, आम्ही सुरक्षित डिझाईनच्या माध्यमातून संशोधन करण्यास पूर्णपणे वचनबद्ध आहोत. कोणताही प्रयोग तेव्हाच केला जाईल जेव्हा तो पूर्णपणे उलटवता येईल आणि पर्यावरणाला कोणतीही हानी होणार नाही.
यासंदर्भात छोटे-छोटे बा प्रयोग (आउटडोअर एक्सपेरिमेंट्स) केले जाणार आहेत. हे प्राथमिक प्रयोग यशस्वी ठरले, तर वैज्ञानिकांना आशा आहे की हे तंत्रज्ञान पुढील १० वर्षांत मोठ्या प्रमाणावर वापरता येईल. म्हणजेच भविष्यात, ग्लोबल वॉर्मिंगशी लढण्यासाठी आपल्या हातात सर्वात मोठे शस्त्र सूर्यकिरणांना थोडेसे वळवण्याचे तंत्रज्ञान असू शकते.