अहमदाबाद : विशेष प्रतिनिधी
गुजरातच्या अहमदाबाद येथे एअर इंडियाचे विमान कोसळले. या विमानात एकूण २४२ प्रवासी होते, ज्यामध्ये अनेक विदेशी प्रवासीही सामील होते. हे विमान लंडनला जात होते, परंतु टेकऑफनंतर काही वेळातच ते अपघातग्रस्त झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, घटनास्थळी बचाव आणि मदत कार्य सुरू झाले. पण नेमकं असं काय झालं की विमान टेकऑफच्या १५ मिनिटातच कोसळलं? असा प्रश्न सर्वांना पडला होता. आता यामागील कारण समोर आले आहे. तथापि विमानातील सर्वच प्रवाशी मृत्युमुखी पडल्याचे वृत्त आहे.


एअर इंडियाच्या विमानाने अहमदाबाद विमानतळावरुन टेकऑफ केलं होतं. त्यानंतर १५ मिनिटात हे विमान मेघानी नगर परिसरातील मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर जाऊन आदळले. समोर आलेल्या माहितीनुसार टेकऑफ केल्यानंतर विमानाच्या दोन्ही इंजिनला पक्षी धडकले. त्यामुळे विमानाचे दोन्ही इंजिन अचानक बंद झाले. पायलटला इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे कळताच त्याने इमर्जन्सीचा सिग्नल दिला होता. पण दोन्ही इंजिन एकाच वेळी बंद झाल्यामुळे विमान इमारतीवर आदळले.
एअर इंडियाच्या माहितीनुसार, विमानाने दुपारी १:३८ वाजता टेकऑफ केले होते. यात २४२ प्रवासी होते, ज्यामध्ये १२ क्रू मेंबर्स आणि २३० प्रवासी होते. यापैकी १६९ प्रवासी भारतीय होते, ५३ ब्रिटिश नागरिक, १ कॅनेडियन आणि ७ पोर्तुगीज नागरिक होते. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.
एअर इंडियाने जारी केला हेल्पलाइन नंबर
अपघातानंतर एअर इंडियाने हेल्पलाइन नंबर जारी केला आहे. सोशल मीडियावरील पोस्टनुसार, प्रवाशांसाठी 1800 5691 444 हा हेल्पलाइन नंबर सुरू करण्यात आला आहे. अपघाताचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे आणि एअर इंडिया तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य करत आहे.