राहू आणि केतू हे असे ग्रह आहेत त्यांना कितीही गोंजारले तरी त्यांचे मुळ स्वभाव गुणधर्म जाणार नाहीत. प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात तशाच राहुला सुद्धा आहेत. उदाहरणार्थ, ज्या भावंडासोबत, मित्र, नातेवाईक चक्क आई-वडिलांसोबत लहानाचे मोठे झालो त्यांच्याशी अगदी किरकोळ गोष्टीवरून वितुष्ट येऊ शकते. भावनिकता लोप पावलेली असते, सगळ्या संवेदना नष्ट होतात, आयुष्यभराची साथ सोबत असलेली माणसे हळूहळू आपल्यापासून दुरावतात, कारण काहीच नसते. दोन व्यक्तींच्या मधील गैरसमजाची एक अदृश्य भिंत. हे गैरसमज संपत नाहीत, ते दूर होत नाहीत अशी स्थिती राहूच निर्माण करतो. कारण राहू पूर्व कर्माचे भोग भोगायला भाग पाडत असतो.

आपल्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचे ह्या जगातून निघून जाणे राहू दशेतच घडते. पैशाचा अपव्यय आणि माणसांचा वियोग त्याचाच परिपाक असतो. राहूच्या दशेत काहीच राहत नाही. नात्यांवरचा विश्वास उडतो आणि मग वास्तवाची जाणीव होते तशी परमेश्वराची आठवण येते.

आपली तब्येत ढासळू लागते, आर्थिक सुबत्ता कमी होते, कामात लक्ष लागत नाही आणि काहीच नकोसे वाटते. ही अवस्थाच मानवाला जाणीव करून देते की, जीवन हे एकटेपणाने नाही तर आपल्या आप्त, मित्र नातेवाईक ह्यांच्यासोबत जगण्यासाठी आहे. परमेश्वराच्या साक्षीने सत्कर्म करत राहण्यासाठी आहे. सगळे दुरावतात पण देव नाही. त्यामुळे सगळ्यांपासून दूर गेला की माणूस ईश्वराच्या समीप आपोआप जातो. क्षमायाचना करू लागतो.
फसवणूक, विश्वासघात हे राहूचे दुसरे नाव आहे जणू. आपण इतके बेमालूम फसतो की आपला आपल्यावरचा विश्वास उडावा. कधी स्वप्नात सुद्धा येणार नाही अशा व्यक्ती आपल्याला फसवून आयुष्यातील मोठे धडे शिकवतात. ज्यांच्या वर आपला आपल्याहीपेक्षा अधिक विश्वास असतो त्यांच्याकडून झालेली फसवणूक आपल्याला अंतर्बा हादरवून टाकते. जगायचे कुणासाठी आणि विश्वास ठेवायचा तरी कुणावर? शेवटी एकच उत्तर परमेश्वरावर! तोच केवळ आपला असतो. समाजात आपले नाव बदनाम करणा-या व्यक्ती राहूच्या दशेत भेटतात. आपल्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन सुद्धा लोकांचा थोडा विचित्र होत जातो आणि आपल्या लोक टाळतात. आपल्याला हे का होत आहे हेच समजत नाही कारण आपण जसे असतो तसेच असतो. आपण बदललेले नसतो तर राहुने परिस्थिती बदललेली असते.
एकुणात, अशा घटनांतून माणसातील स्वत्वाची ओळख करून देण्याच्या राहूच्या असामान्य क्षमतेची ओळख आपल्याला होते. कितीही काहीही म्हणा राहूचे खेळ आपल्याला अंतर्मुख करायला भाग पाडतात. स्वत:साठी जगा आणि ह्या लौकिक गोतावळ्यात अडकू नका हेच तर राहुला सांगायचे असते.
सा-या जगावर आधुनिक तंत्रज्ञानाची मोहिनी टाकणारा राहू हा पूर्णत: वाईट नाही. त्याने तर जग जवळ आणले आहे. आजचे प्रगत युग हा राहूचा चमत्कार अर्थात आविष्कार आहे. प्रत्येक वाईट गोष्टीतूनही काहीतरी चांगले शिकण्याचा धडा राहू देत असतो. राहुला पूर्णत: समजून घेणे कठीण आहे. अदृश्य शक्ती आपल्या अवती भोवती आहे पण आपण तिला ओळखू शकत नाहीत. इथे प्रत्येक माणसात राहू आहे. आपल्या तोंडासमोर गोड बोलणारी माणसे पाठ वळताच आपलीच निंदा करणार हे गृहीत धरून चालणे, सजग आणि सतर्क राहणे, अतिबाष्कळ न बोलणे, उचित तितकेच बोलणे हा राहू पीडा टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.
– श्रीपाद सबनीस (ज्योतिष अभ्यासक)
मोबाईल : 9960542605
श्री अॅस्ट्रॉलॉजी, संभाजीनगर (औरंगाबाद)