नवी दिल्ली : प्रतिनिधी
भारतीय डॉक्टरांनी अवघ्या नऊ दिवसांत रक्ताचा कर्करोग (Blood Cancer) पूर्णपणे बरा करण्यात यश मिळवलं आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच CAR-T पेशी रुग्णालयातच तयार करून थेट रुग्णाला देण्यात आल्या. दिल्लीतील भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेने ही वैद्यकीय क्षेत्रातील मोठी कामगिरी केली आहे. या उपचारानंतर ८० टक्के रुग्णांमध्ये १५ महिन्यांनंतरही कर्करोग पुन्हा दिसून आला नाही, असा दावा आयसीएमआरने केला आहे.

ICMR च्या मते, या चाचणीतून कर्करोगाचा उपचार स्वस्त, जलद आणि रुग्णांच्या जवळ कसा करता येतो हे दिसून येते. भारत आता स्वदेशी जैव-थेरपी विकसित करण्यात आघाडीवर आहे. ही कामगिरी जागतिक स्तरावर देखील महत्त्वाची मानली जात आहे. ICMR आणि सीएमसी वेल्लोर यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही चाचणी पार पडली. या प्रकल्पाला ‘वेलकार्टी’ असं नाव देण्यात आलं आहे. याचे परिणाम ‘मॉलिक्युलर थेरपी ऑन्कोलॉजी’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहेत.
जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या तपशीलांनुसार, डॉक्टरांनी तीव्र लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया आणि मोठ्या बी-सेल लिम्फोमाग्रस्त रुग्णांवर उअफ-ळ थेरपीची चाचणी केली. या प्रक्रियेत, रुग्णाच्या स्वत:च्या टी-पेशीला (रोगप्रतिकारक पेशी) कर्करोगाशी लढण्यायोग्य बनवलं जाते. भारतातील CAR-T थेरपीची ही पहिली चाचणी नाही. इम्युनो अॅक्ट आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई यांनी एकत्रितपणे पहिली स्वदेशी थेरपी विकसित केली होती, ज्याला २०२३ मध्ये केंद्राकडून मान्यता देखील मिळाली होती.
ICMR ने म्हटले आहे की, तीव्र लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया कर्करोगाने ग्रस्त सर्व रुग्ण बरे झाले आहेत, तर मोठ्या बी-सेल लिम्फोमा रुग्णांपैकी ५० टक्के रुग्ण रोगमुक्त झाले आहेत. परंतु न्यूरोटॉक्सिसिटी म्हणजेच मज्जासंस्थेवर परिणाम झालेला आढळला नाही.