नवी दिल्ली : प्रतिनिधी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेल्या शुल्क वाढीमुळे व्यापार युद्ध भडकले आहे. विशेषत: अमेरिका आणि चीनमधील व्यापार व्यवहारात अधिक तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. पण या दोन्ही देशांमधील व्यापार युद्धाचा भारतीय ग्राहकांना फायदा होण्याची शक्यता अधिक आहे. कारण अमेरिकेसोबतच्या तणावादरम्यान चीनमधील अनेक इलेक्ट्रॉनिक कंपन्या भारतीय कंपन्यांना ५ टक्क्यांपर्यंत किमती कमी करण्याच्या ऑफर्स देऊ लागल्या आहेत. याचाच अर्थ असा आहे की, येणा-या काही दिवसात स्मार्टफोन, TV, फ्रिज आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किमती भारतात कमी होऊ शकतात.

भारतीय इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या मागणी वाढवण्यासाठी या सवलतीचा काही लाभ ग्राहकांना देऊ शकतात. भारतात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांत वापर होणा-या सर्व भागांपैकी सरासरी तीन-चतुर्थांश सुटे भाग चीनमधून आयात होतात.
सर्वसामान्यपणे इलेक्ट्रॉनिक्स उद्योग हा दोन ते तीन महिन्यांच्या कच्च्या मालाच्या साठवणुकीवर चालतो. कंपन्या मे-जूनपासून नवीन ऑर्डर देतील. ‘जीटीआरआय’च्या अलीकडील एका अहवालानुसार, भारताची आर्थिक वर्ष २०२४ मध्ये इलेक्ट्रॉनिक्स घटकांची आयात मागील वर्षाच्या तुलनेत ३६.७ टक्क्यांनी वाढून ३४.४ अब्ज डॉलर्सवर पोहोचली. ही आयात गेल्या पाच वर्षांत ११८.२ टक्क्यांनी वाढली, असे वृत्तात पुढे म्हटले आहे.
एकमेकांवर शुल्क (रेसिप्रोकल टॅरिफ) लागू करण्यावरून व्यापार युद्धाचा भडका उडाला आहे. त्यानंतर विविध देशांकडून आलेल्या दबावानंतर ट्रम्प यांनी बुधवारी बहुतांश देशांसाठी ९० दिवसांकरिता शुल्क स्थगिती जाहीर केली.