विश्लेषण/श्रीपाद सबनीस

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांकडे लोकसभेची सेमी फायनल म्हणून बघितलं जात होतं. देशाचा मूड काय आहे हे कळायला मदत होईल या अपेक्षेने सर्व पक्ष आणि कार्यकर्ते या निवडणुकांकडे बघत होते.
हिंदी पट्ट्यातील तीन राज्यात मोदी लाट कायम असल्याचं पक्कं झालं. या पाच राज्यांपैकी तेलंगणा आणि मिझोराममध्ये भाजपला गमावण्यासारखं काही नव्हतं. झाला तर फायदाच होणार होता. जो त्यांना झाला.. दोन्ही राज्यात त्यांनी आपली कामगिरी सुधारली. पण भाजपचं सारं लक्ष राजस्थान, छत्तीसगड परत मिळवणं आणि त्याही पेक्षा जास्त लक्ष मध्यप्रदेश कायम राखण्याकडे होतं.
२०१८ पर्यंत या तिन्ही राज्यात भाजप सलग तीन तीन टर्म जिंकली होती पण त्या काळातल्या रमण सिंह, वसुंधरा राजे सिंधिया अशा मोठ्या नेत्यांवर अवलंबून न राहता भाजपने नवी टीम बांधण्यावरही भर दिला. भाजपच्या एकखांबी तंबुचा संपूर्ण प्रचार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भोवती फिरत होता, तसा तो गेली ५-७ वर्षांपासून फिरतोय आणि त्याचा लाभही भाजपला होत आहे, ही वस्तुस्थिती सर्वांनीच मान्य केली आहे.
या पाच राज्यांच्या निवडणुकीतही मोदींच्या देशप्रेमी, हिंदू धर्माभिमानी, विकासपुरुष छबीचा अत्यंत खुबीने वापर करण्यात आला. या प्रचारात काँग्रेसवरकिंवा राहुल गांधीवर टीका होती पण त्यासोबत मोदी सरकारच्या कामाचा पाढा सुद्धा वाचला जायचा.
तीन राज्यातील मतदारांनी मोदींवर आणि भाजपवर पुन्हा विश्वास टाकला. चार महिन्यावर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणूकीत मोदी लाट थोपवण्याचं काँग्रेस आणि मित्रपक्षांसमोरचं मोठं आव्हान आणखी कठीण झालं आहे. आपापसातले मतभेद दूर सारुन ते कशी रणनीती आखतात यावर ती लढत अटतटीची होणार की मोदी सहज विजयाची हॅटट्रिक साजरी करणार हे ठरेल.
असाच प्रकार २०१४ साली भाजपने महाराष्ट्रात केला होता. १९९९ ते २०१४ अशी १५ वर्ष विरोधात बसावं लागल्याने आत्मविश्वास गमावून बसलेल्या भाजप नेत्यांपैकी एकालाही मुख्यमंत्री प्रोजेक्ट न करता. देशात ऐतिहासिक यश मिळवणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर निवडणूक लढली गेली. निकालानंतर काही मोठ्या नेत्यांना बाजुला सारत मोदींनी देवेंद्र फडणवीस यांच्या सारख्या तरुण आमदारावर विश्वास दाखवत पुरोगामी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा भार टाकला. वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करत फडणवीसांनीही पाच वर्ष सरकार चालवत तो विश्वास सार्थ ठरवला.
त्यानंतर २०१९ ला फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट केलं गेलं आणि मतदारांनी सुद्धा भाजप शिवसेना युतीच्या पारड्यात बहुमतापेक्षा कितीतरी जास्त म्हणजे १६१ जागा टाकल्या होत्या, पण नंतर काय झालं हा इतिहास ताजा आहे. आता भाजपसोबत शिंदे गट आणि अजित पवार गट आहेत त्यामुळे २०२४ च्या विधानसभेसाठी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याची शक्यता कमीच दिसतेय. २०१४ सालचीच सुरक्षित रणनिती महाराष्ट्रात वापरली जाईल असे दिसते.
भाजपासाठी, पंतप्रधान मोदींसाठी आणि या वर्षी विजयादशमीला शताब्दी वर्षात प्रवेश करणा-या संघासाठी चमत्कारीक आकडा गाठणारा विजय मिळवणं अधिक आवश्यक आहे. प्रभू रामाने देशाचा मूड सेट केलाय. या रामात आता राष्ट्राला जोडायचं आहे. वैश्विक दृष्टीकोण असेल तरच राष्ट्र जोडलं जाईल. इतिहासाच्या गाठी सोडताना अनेक देश इतिहासातील समस्या सोडवताना अधिकच गुरफटून गेलेत. समस्येत अडकलेत, असं मोदी सांगतात.
मोदींनी मांडलेला हा दार्शनिक भाव सत्यच आहे. मोदींना या इतिहासातील गाठी तोडायच्या आहेत, सोडायच्या आहेत. तेच सरसंघचालक भागवत यांनाही करायचं आहे. या गाठी सोडवताना गुरफटलो नाही तर जनतम मोठं होईल. बहुमत मोठं मिळेल.