पंजाबमधील गुरदासपूर येथे आज (दि. ११) शेतकरी आणि पोलिसांमध्ये झालेल्या जोरदार झटापटीमध्ये ७ जण जखमी झाले आहेत. एक्स्प्रेस वे साठी आमच्या जमिनींचा जबरदस्तीने ताबा घेतला जात आहे, तसेच या जमिनीचा योग्य मोबदला दिला जात नाही, असा आरोप शेतक-यांनी केला आहे.५ मार्च रोजी चंदीगडमध्ये आंदोलनावरून शेतकरी आणि पोलीस आमने सामने आले होते. शेतकरी संघटनांनी भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात आंदोलन केले होते. तसेच सरकारच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती.५ मार्चपासून एक आठवडाभर आंदोलन करण्याचे नियोजन होते. तसेच संपूर्ण पंजाबमधून येथे शेतकरी येणार होते. मात्र तत्पूर्वीच पोलिसांनी आंदोलक शेतकरी नेत्यांना ताब्यात घेतले. तसेच आंदोलक शेतक-यांना वाटेतच अडवले.आंदोलक शेतक-यांनी घडलेल्या घटनेबाबत सांगितले की, दिल्ली-कटरा एक्स्प्रेस महामार्गासाठी जमिनीचे अधिग्रहण करण्यावरून वाद सुरू आहे. गुरदासपूरमध्ये जमिनीचा ताबा घेण्यावरून शेतकरी आंदोलक आणि पोलिसांमध्ये वाद झाला. प्रशासनाने कुठलीही पूर्वसूचना न देता आमची जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला.