भाजप श्रेष्ठींनी तीन-चार राजकीय सर्वेक्षण कंपन्यांकडून राज्यातील प्रत्येक लोकसभा-विधानसभा मतदारसंघाचे सर्वेक्षण गेल्या दोन ते अडीच महिन्यात केले.

भाजपच्या विद्यमान खासदार आणि आमदारांपैकी साधारणपणे ६० टक्के जागा BJP जिंकू शकते मात्र ४० टक्के जागा धोक्यात आहेत. असा निष्कर्ष या पाहणी अहवालात नोंदविण्यात आला आहे.
जनतेला पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी हवे आहेत, पण उमेदवार बदला, असा धक्कादायक निष्कर्ष भाजपच्या या सर्वेक्षणात दिसून आला. त्यामुळे विद्यमान आमदार-खासदारांना उमेदवारीची चिंता वाटू लागली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्यावर नव्याने सर्वेक्षण करण्यात आले. प्रत्येक मतदारसंघातील राजकीय परिस्थिती, आमदार-खासदारांचे कार्य, जनता व पदाधिकाऱ्यांशी वर्तन, समाजमाध्यमांवरील सहभाग, जनतेचे मोदी आणि आमदार-खासदाराविषयीचे मत आदी बाबींविषयी विस्तृत सर्वेक्षण करण्यात आले.
राज्यातील प्रत्येक आमदार-खासदाराच्या मतदारसंघातील परिस्थितीचा आढावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सह संघटन मंत्री शिवप्रकाश आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी घेतला. त्यात भाजप BJP च्या प्रत्येक आमदार-खासदाराचे सर्वेक्षणानुसारचे रिपोर्ट कार्ड देण्यात आले व त्याविषयी कुठेही वाच्यता न करण्याची ताकीद देण्यात आली.
लोक प्रतिनिधींच्या कामानुसार त्यांना श्रेणी देण्यात आली असून तो मतदारसंघ भाजपला किती सुरक्षित आहे किंवा धोक्यात आहे, याविषयी बारीकसारीक तपशील देण्यात आला आहे.
BJP १७० जागा लढवणार
शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना त्यांच्या विद्यमान आमदार – खासदारांव्यतिरिक्त फारशा जागा BJP देणार नाही. विधानसभेसाठी साधारणपणे १७० जागा लढविण्याची तयारी भाजप करीत असून उर्वरित जागा शिंदे व पवार गटाला दिल्या जातील. अजित पवारांबरोबर किती आमदार आहेत, हा आकडा अजून गुलदस्त्यात असल्याने त्यांना त्यांच्याकडे असलेल्या आमदारांव्यतिरिक्त फारशा जागा मिळणार नाहीत.
आमदार, खासदारांवर नाराजी
सर्वेक्षणात जनतेकडून मोदी आणि आमदार-खासदाराबाबत घेतलेल्या प्रतिसादानुसार ५०-६० टक्के लोकांनी मोदींना पसंती दिली, मात्र उमेदवार बदलण्याचे मत व्यक्त केले. संबंधित लोकप्रतिनिधीने कोरोना काळात व नंतरही आरोग्य प्रश्नी मदत केलेली नाही, अन्य कामे देखील केलेली नाहीत, उर्मटपणे वागणूक दिली जाते, भ्रष्टाचार आहे, आदी अनेक तक्रारी केल्या आहेत.
डिसेंबरमध्ये होणार सर्व्हे
BJP भाजप पक्षश्रेष्ठींनी हा अहवाल गंभीरपणे घेतला असून पुढील सर्वेक्षण येत्या डिसेंबरमध्ये होणार आहे. प्रत्येक आमदार-खासदारांच्या कामाच्या व अहवालातील श्रेणीनुसार निवडणुकीत उमेदवारी दिली जाणार आहे. कोणीही पक्षाला गृहीत धरू नये. तीन महिन्यात कामात कोणती प्रगती केली, याचाही आढावा नंतर घेतला जाणार असून त्यानंतरच उमेदवारी द्यायची की नाही, याचा विचार केला जाणार आहे.